Jio आणि Airtel लवकरच त्यांच्या प्रीपेड व पोस्टपेड रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती 15% ते 20% पर्यंत वाढवू शकतात.
Jio, Airtel यूजर्ससाठी एक चिंताजनक बातमी आहे. देशातील दोन्ही मोठ्या टेलिकॉम कंपन्या लवकरच आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती वाढवू शकतात. ही दरवाढ येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असून त्यानंतर ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. Jio आणि Airtel च्या ग्राहकांना मासिक रिचार्जसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. जागतिक तणावामुळे आधीच महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत असताना आता मोबाईल वापरणेही आणखी महाग होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया, मोबाईल रिचार्ज प्लॅन्सच्या किंमतीत किती वाढ होऊ शकते.
Jio आणि Airtel या देशातील दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या असून त्या लवकरच आपल्या मोबाईल रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढवू शकतात. Telecom Talk च्या अहवालानुसार, दोन्ही आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आपल्या मोबाईल रिचार्ज प्लॅन्समध्ये 15 टक्क्यांपासून 20 टक्क्यांपर्यंत दरवाढ करू शकतात. असे झाल्यास ग्राहकांसाठी मोबाईल वापरणे आणखी महाग होईल. कारण यापूर्वीही या कंपन्यांनी अनेक वेळा मोबाईल रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या आहेत.
Jio आणि Airtel यांच्या दरवाढीबाबत कंपन्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, एकूण परिस्थिती पाहता मोबाईल ग्राहकांवर सर्वच बाजूंनी आर्थिक ताण वाढत असल्याचे दिसत आहे. एकीकडे मेमरी चिपच्या तुटवड्यामुळे स्मार्टफोनच्या किंमती गगनाला भिडत आहेत, तर दुसरीकडे मोबाईल रिचार्जच्या किंमतीही सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे मोबाईल वापरणे ग्राहकांसाठी अधिक खर्चिक ठरत आहे.
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, ही संभाव्य दरवाढ अशा वेळी होत असल्याची चर्चा आहे, जेव्हा नेटवर्कच्या गुणवत्तेबाबत वापरकर्त्यांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. अनेकदा Jio आणि Airtel सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहकांकडूनही नेटवर्क क्वालिटी, कॉल ड्रॉप आणि इंटरनेट स्पीड यांसारख्या समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीत मोबाईल रिचार्ज प्लॅन्सच्या संभाव्य दरवाढीच्या बातमीमुळे ग्राहकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जाहिरात
जाहिरात